होळी सणाची माहिती
होळीची दंतकथा:
ही होळी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे ती अशी की, हिरण्य कश्यप नावाचा राजा होता. तो फार अहंकारी आणि गर्विष्ठ होता. त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा परम भक्त होता. तो सतत भगवान विष्णूचे नाव घेत राहायचा. याची चीड राजाला यायची. तो स्वतः लाच देव समजायचा आणि मुलाला देखील असेच सांगायचा. पण ते त्याला पटायचे नाही.
एके दिवशी राजा आपल्या बहिणीसोबत कट रचतो आणि स्वतः च्याच मुलाला मारायचे ठरवतो. राजाची बहीण होलिका तिला एक वरदान असते ते असे की तिला अग्नी जाळू शकत नाही. म्हणून ती प्रल्हादाला घेऊन बसते आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न करते. पण तीच त्यात जाळून खाक होते आणि प्रल्हाद काही जळत नाही कारण तो सतत भगवान विष्णूचा जप नामस्मरण करत असतो. तर अशा प्रकारे होलिका त्या अग्नित जाळून खाक होते.
भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे अग्नीपासून रक्षण केले म्हणून त्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो. तसेच आपले दृष्ट विचार किंवा इतर वाईट गोष्टी त्या अग्नीत जाळून खाक होतात असे आपले मानणे आहे.
एकंदरीत पाहता होळीतील अग्नी वाईट वृत्ती जाळून टाकते. त्यामुळे होळी साजरी करतात आणि दुसऱ्या दिवशी वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणून रंगपंचमी साजरी करतात.
होळी शेतकऱ्यांसाठी महत्वाची
- या पौराणिक कथे प्रमाणेच भारतातील शेतकऱ्यांसाठी देखील होळी या सणाचे खूप महत्त्व आहे.
- यामध्ये कृष्ण आणि बलराम यांच्या नात्याला, या दोघांनाही स्मरण केले जाते. त्यांची पूजा केली जाते. तसेच या दिवसांमध्ये जे पीक येते. त्यासाठी देवाला ते अर्पण केले जाते आणि त्याला धन्यवाद देऊन प्रार्थना देखील केली जाते.
- काही ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची पद्धत आहे. कारण या दिवसात गव्हाचे पीक जास्त प्रमाणात तयार होत असते. तसेच नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याची देखील पद्धत काही ठिकाणी आपल्याला दिसून येते.
होळी कशी साजरी करतात?
- देशभरात विविध ठिकाणी होळीचे वेगवेगळे रंग रूप आपण पाहू शकतो. जशी की उत्तर प्रदेश मध्ये लठ मार होळी साजरी केली जाते. बंगालमध्ये वसंत उत्सव, पंजाब मध्ये होला मोहल्ला इत्यादी. एवढेच नव्हे तर विविध गावात वेगवेगळ्या प्रथा आहेत.
- काही ठिकाणी होळीच्या समोर गाऱ्हाणी मांडली जातात. नवस केले जातात. पालख्या देखील नाचवल्या जातात.
- वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवसापर्यंत हा सण साजरा केला जातो. जसे की काही ठिकाणी दोन दिवस ,काही ठिकाणी तीन दिवस, काही ठिकाणी पंधरा दिवस, हा सण साजरा केला जातो.
- हिवाळा संपणे आणि वसंत ऋतुची आगमन यासाठी होळी या सणाला खूप महत्त्व आहे.
- होळीच्या दिवशी होळीचे दहन करून आणि दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करून धुळवड साजरी करतात.
- तसेच या दिवशी महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य, कटाची आमटी आपणास घरोघरी नक्की मिळेल. घरातील स्त्रिया होळीची पूजा करतात. तसेच नारळ या होळीमध्ये टाकला जातो.
- दुसऱ्या दिवशी अग्निशांत झाल्यावरती त्यातील नारळाचे उरलेले अवशेष प्रसाद म्हणून वाटण्यात येतात. त्यातील राख काहीजण घेऊन आपल्या घरात ठेवतात.
- काही ठिकाणी या होळीच्या दिवसांमध्ये भांग पिण्याची देखील पद्धत आहे. पण मित्रांनो जरा जपूनच कारण भांग घेतल्यानंतर आपले आपल्यावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे आपण मनोरंजनाचा विषय देखील बनवू शकतो. म्हणून थोडीशी सावधानता बाळगावी एवढेच.
- याव्यतिरिक्त दहिवडे, मालपोहा, थंडाई, गुजिया, इत्यादी पदार्थांचा देखील समावेश होतो.
- तर अशी ही होळी जी सर्वांना एकत्र आणते. वाईट विचारांचा नाश होतो किंवा अग्नीमध्ये ते खाक होतात.