आपणा सर्वास गणपतीच्या संकष्टी चतुर्थी आणि अंगारिका संकष्टी चतुर्थी याबद्दल माहीतच असेल.
प्रत्येक महिन्यात जी येते संकष्टी चतुर्थी आणि सहा महिन्यातून एकदा जी येते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.
अंगारकी संकष्टी चतुर्थी पौराणिक कथा
गणेश पुराणात तसेच मुदगल पुराणात या अंगारिका संकष्टी चतुर्थी बाबतीत एक गोष्ट आहे. ती म्हणजे एका अवंती नगरात गणेशभक्त आणि वेदांचे ज्ञान असलेले ऋषी भारद्वाज होते।
एकदा शिप्रा नदी वरती ते स्नानाला गेले. त्यावेळेस एक अप्सरा येथे जलक्रीडा करत होती. तिला पाहून ऋषी भारद्वाज द्रवीभूत झाले आणि ते पृथ्वीने धारण केले आणि त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो अगदी जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केला. ऋषींनी त्याचे उपनयन केले. वेद शिकविले.
चतुर्थीला अंगारकी नाव का पडले?
तसेच गणेश उपासना करायला सांगितले. म्हणून तो मुलगा अरण्यात गेला आणि त्याने सहस्त्र वर्ष तप केले आणि गणेशाला प्रसन्न केले. त्याच्या या उपासनेने गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या मुलाला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले,
“ त्या मुलाने सांगितले की, त्याला स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचे आहे. तसेच त्याचे त्रिलोकात नाव व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तसेच आज जी चतुर्थी आहे. ती सर्वांसाठी कल्याणकारी असू दे असे देखील त्यास वाटे.” या वरती भगवान गणेशाने त्याला खालील आशीर्वाद दिला.
तो असा कि ,“आजची चतुर्थी सर्वांसाठी कल्याणकारी होईल.” असं वरदान देतो. तसेच तुझे नाव भूमिपुत्र म्हणून भौम. अंगारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक. ज्याला आपण सर्व मंगळ ग्रह म्हणून संबोधतो आणि शुभ करण्याची शक्ती आहे म्हणून मंगल असे देखील प्रसिद्ध होईल. या चतुर्थीला अंगारकी म्हणतात
व हे व्रत करणारे ऋणमुक्त होतील. तसेच त्यांना याचे पुण्य देखील मिळेल. तसेच आकाशामध्ये ग्रहांमध्ये तुला स्थान मिळेल आणि तू अमृतपान देखील करू शकशील”,असा वर त्याला गणेशाने दिला. तसेच तो वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले.
फलप्राप्ति काय होते
- गणेशाने आपल्या आवडत्या भक्ताला वरदान दिले की, पुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही त्याच्याच अर्थात अंगारकी नावाने ओळखली जाईल आणि जो कोणीही संकष्टी करेल २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थी मुळे मिळेल.
- तसेच त्याच्या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य देखील त्यांच्या वाटेला जाईल आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील.
- तसेच ज्या गणेश भक्तांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसेल. त्यांनी अंगारकी मात्र न विसरता आवर्जून करावी. त्यामुळे २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती होते.
अंगारिका चतुर्थी चे व्रत कसे करावे?
व्रताच्या दिवशी सकाळपासून उपास ठेवावा. संध्याकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणपतीची योग्य पद्धतीने पूजन करायचे. त्यानंतर आरती म्हणून फुल, हळद, कुंकू, अक्षता आणि दुर्वा अर्पण करून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. काही ठिकाणी तळलेले मोदक दाखवतात, काही ठिकाणी उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतात. त्यानंतर चंद्र दर्शन घ्यायचे आणि चंद्राला हळद-कुंकू,अक्षता, फूल वाहून नमस्कार करायचा. अंगारकी महात्म्याची पोथी वाचायची. गणपतीचे नामस्मरण करून भोजन करायचे आणि उपास सोडायचा. जर कधी या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली. तर फक्त उपास करावा आणि गणपतीचे स्मरण करावे. रात्रीच्या चंद्रोदयानंतर उपास सोडावा. पूजा विधी करू नये.
या व्रताचे फायदे:
प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी प्रमाणे या व्रताच्या पालनाने देखील संकटे नष्ट होतात.
संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात. भांडण मिटते, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची तीव्रता कमी होते.
विवाह करू इच्छिणाऱ्यांची लग्न जमतात. तसेच २१ संकष्टी चतुर्थी असो किंवा अंगारिका संकष्टी चतुर्थी असो यांचे फळ एक सारखेच मिळते.
अजून एक महत्त्वाची सूचना येथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, हे व्रत एकाच दिवसाचे आहे. म्हणजेच चंद्रोदयानंतर उपास सोडावा. दुसऱ्या दिवशी उपास सोडणे योग्य नाही आणि ते बाप्पाला देखील आवडणार नाही.