अमावस्या
“अमावस्या” हा शब्द आपल्या सर्वांना माहीतच असेलच. आपल्याकडे अमावस्या म्हटली की एक भीतीचं वातावरण आपल्या मनात तयार होते. कारण घरातील वडीलधाऱ्या माणसांनी हेच सांगितलेलं असतं की अमावस्या म्हणजे वाईटच.
या दिवशी भूत खेतं जमिनी वरती येतात. तसेच एखादी वाईट शक्ती किंवा कोणाच्या नुकसान करायचे असेल तर त्यासाठी करणी करणे किंवा इतर पूजा वगैरे करण्याचा हा दिवस असतो. पण त्याही पलीकडे ही अमावस्या म्हणजे काय? ते आपण या लेखात पाहूया.
अमावस्या: वाईट शक्ति? की इतर काही?
अमावस्या : एक तिथी
अमावस्या ही एक चंद्र तिथी आहे. म्हणजेच या दिवशी चंद्र दिसत नाही. आपल्या ब्रम्हांडात चंद्र या ग्रहाच्या स्थितीमुळे आपल्या भूतलावरती वेगवेगळे परिवर्तन आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच ज्या तिथीला चंद्र आपल्याला अजिबात दिसत नाहीत. एकदम गडद काळोख किंवा गर्द अंधार असतो ती म्हणजे अमावस्या. अमावस्येला सूर्यग्रहण होते.
तसेच चंद्र हा दिवसा आकाशात तर असतो. पण तो सूर्याच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे त्या सूर्यप्रकाशात आपल्याला दिसत नाही आणि म्हणून रात्री पृथ्वीवरून आपण चंद्र पाहू शकत नाही. कारण की तो दिसतच नाही. ही तिथी अमावस्या म्हणून अशी संबोधली जाते.
अमावस्येचे प्रकार किती: कधी व केव्हा येते?
तसे पाहता प्रत्येक महिन्यात एकदाच अमावास्या येते. त्यात वेगवेगळ्या अमावस्या आपण ऐकल्याच असतील. सोमवारी येणारी सोमवती अमावस्या, शनिवारी येणारी शनी अमावस्या, आषाढ महिन्यातली आषाढी अमावस्या, जी ला आपण गटारी पण म्हणतो त्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. त्यानंतर पिठोरी अमावस्या, सर्वपित्री अमावस्या, पौष महिन्यात येणारी मौनी अमावस्या. या वेगवेगळ्या महिन्यात येणाऱ्या अमावस्या आपण ऐकल्याच असतील.
तर अशी ही अमावस्या जी प्रत्येक महिन्यात येतेच. कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजे अमावस्या.
या तिथीतही देवता आहे. ती म्हणजे पितरे. म्हणजेच आपले पूर्वज. या दिवशी आपण पितृ दान करू शकतो. तर्पण करू शकतो. श्राद्ध करू शकतो.
आपल्याकडे अमावास्येबद्दल अनेक समज गैरसमज आहेत आणि आपण ते पूर्वापार चालत आल्यामुळे तसेच पाळत असतो आणि अजूनही पाळत आहोत. जसे कि अमावास्येच्या दिवशी प्रवास करू नये किंवा रात्र झाल्यावर घराबाहेर पडू नये. नकारात्मक शक्ती बाहेर वावरत असतात. अमावास्येच्या दिवशी नारळ देण्याची देखील प्रथा आहे. बऱ्याचदा अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी अर्धवट फोडलेले नारळ चौकात आढळतात. ते याच प्रथेमुळे. अजून एक म्हणजे घरातील लहान मुलांची दृष्ट काढली जाते आणि त्या नंतर काही झाले तरी त्यांना घराबाहेर पाठवत नाही. तर हे असे अनेक समज जे अजूनही पाळले जातात.
अमावस्या एक शापित रात्र?
अमावस्याकडे आपण नेहमीच वाईट गोष्ट म्हणून बघत आलो आहोत. तो काळा दिवस ज्या दिवशी चंद्राचा प्रकाश नसतो. अशी ती शापित रात्र असते असे देखील म्हणतात. पितरांचा वावर असणारी, काळीभोर रात्र…… ज्यात नेहमी वाईटच घडते. जोदू टोणा करण्यासाठी योग्य अशी हि रात्र असते. असा समज आहे. त्यात कोणतेही शुभ कार्य आपण या दिवशी अजिबात करत नाही. एक तर अमावस्या झाल्यानंतर ते कार्य करतो. मग ते कुठचेही असो. पण या दिवसात जर झाडे लावली तर ती चांगली बहरतात असा समज आहे. त्यांची वाढ चांगली होते. इतकेच नव्हे तर केस देखील अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी कापले तर ते देखील वाढतात. कारण अमावास्येपासून चंद्र कले कलेने वाढत जातो आणि मग पौर्णिमा येते. त्यामुळे जशी चंद्राची वाढ होते. तशीच आपल्या केसांचीदेखील वाढ होते, झाडांची देखील वाढ होते. म्हणून अमावस्येदिवशी झाडे लावावीत.
तर अशी हि अमावस्या…. आपल्याला नको असलेली. तरी आपल्या महिन्याचा एक अविभाज्य भाग. कारण अंधारानंतर प्रकाश येतोच. अगदी तसेच अमावस्येनंतर पौर्णिमा हि येतेच. त्यामुळे अमावस्या नक्कीच गरजेची आहे आणि हि एक तिथी आहे. काही संपूर्ण महिना किंवा वर्ष अमावस्या नाही आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. फक्त प्रत्येक महिन्यातून एकदा हि अमावस्या येते आणि ती येणारच.
आपल्या कालमापनातील एक नेहमी होणारी गोष्ट आहे. त्यामुळे कॅलेंडर मध्ये नक्कीच हा अमावस्येचा दिवस नेहमी असणार यात तीळ मात्र शंका नाही. अमावस्येच्या दिवशी अनेक तोडगे केले जातात. ज्याने आपले आयुष्य सोपे होते आणि जीवनातील काही अडचणींवर मात करता येते. या तोडग्यांनी खरंच काही होते हे काही माहित नाही. पण अनेक जण अमावस्येदिवशी काही तोडगे करतात. तर हि होती अमावस्या या दिवसाची माहिती.