अगं, “जरा स्वयंपाकात लक्ष दे. लवकर उठ. सासरी उशिरा उठता येणार नाही.”
असे अनेक संवाद प्रत्येक मुलीने आपल्या आईकडून ऐकले असतील. या लेखात पाहू काही गोष्टी: ज्या मुलीला सुखी संसारासाठी लग्न करण्याआधी माहित असायला हव्यात.
काही गोष्टी ज्या मुलीला सुखी संसारासाठी लग्नाआधी माहित असाव्यात
●स्वयंपाक: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रत्येक मुलीला स्वयंपाक करता येणे गरजेचे आहे. अगदी बेसिक स्वयंपाक देखील मुलीला आलाच पाहिजे. बाकी लग्नानंतर हळूहळू शिकता येते.
●कायदे: बायकांच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांची माहिती प्रत्येक मुलीला असणे गरजेचे आहे. अगदीच जेव्हा पाणी डोक्यावरून जाईल तेव्हा तुम्ही या कायद्यांचा वापर करू शकता. त्यामुळे वेगवेगळ्या कायद्यांची माहिती करून घ्यावी.
●लैंगिक विषय: स्वतःच्या शरीराबद्दल मुलींना व्यवस्थित माहिती असावी. लग्नानंतर सेक्स लाईफ काय असते? मुलं होणे, गर्भ धारणा, मासिक पाळी या बाबतीत मुलीच्या आईने किंवा तिच्या लग्नं झालेल्या मैत्रिणीनीं मार्गदर्शन करावे. तिच्या मनातील शंकांचे निरसन झाले तर अजून चांगले होईल. खरं तर या विषयावरती कोणी काहीच सांगत नाही. एकदा का लग्न झाले की मुलीला ते आपोआप कळेल याच विचारात सगळे असतात किंवा विवाहपूर्व समुपदेशनाची मदत घ्यावी.
●वैद्यकीय चाचण्या : तुम्हाला वैद्यकीय चाचण्या करायच्या असतील किंवा लग्न झाल्यानंतर मूल होण्याआधी काही वैद्यकीय चाचण्या करायच्या असतील. तर त्या कोणत्या आहेत याची देखील माहिती आधीच करून घ्यावी.
●भेदभाव नसावा : सासरच्या मंडळीं मध्ये आणि माहेरच्या मंडळींमध्ये कधी पण भेदभाव करू नये. स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याची इतरांसोबत तुलना करू नये. सतत माहेरच्या लोकांच्या नावाची माळ सासरी जपू नये. सासरच्या मंडळींना देखील आपलेसे मानावे हि समज मुलीला आधीच देऊन ठेवावी.
●आदर करा : मुलीला सर्वच नात्यांचा आदर करायला शिकवा. कोणालाही उलट बोलू नये हे देखील सांगा.
●चुगली करू नये : सासरच्या गोष्टी माहेरी सांगू नये. स्वतः आणि नवऱ्या मधील भांडणे सासू-सासर्यांना सांगू नये. घरातील वाद, घरातील गोष्टी घरातच राहू द्याव्यात. हे तिला आधीच सांगून ठेवावे.
●नाही म्हणायला शिकवा : एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध घडत असेल. तर त्या गोष्टीसाठी सरळपणे नाही म्हणायला तिला शिकवा. जसे की सासरची मंडळी पैशासाठी तिला सतवत असतील, किंवा तिच्यावर नवऱ्याची जबरदस्त होत असेल. तर अशा काही गोष्टींसाठी तिने नाही म्हणायला शिकले पाहिजे.
●धार्मिक विधी, पूजा पाठ, सण: या सर्व गोष्टींची माहिती मुलींना असणे गरजेचे आहे. जरी काही येत नसेल तर ते मनमोकळेपणाने सासरच्याकडे ते मान्य करावे आणि त्यांच्याकडून शिकून घ्यावे. एकंदरीत काय काही पद्धतींमध्ये बदल आढळून येतात. त्यामुळे थोडीफार माहिती प्रत्येक गोष्टींची मुलींनी ठेवली पाहिजे. इथे सर्वस्वी जबाबदारी मुलीच्या आईची असते कि चार रीतीभाती आणि सणवार यांची माहिती मुलीला देणे. हल्लीच्या मुली फक्त फोन मध्येच असतात हे देखील कुठे तरी बदलले गेले पाहिजे.
●आपले म्हणायला शिकवा : उगाचच सासरी माहेरचा जास्त बोलबाला करू नये. तसेच “माझ्या माहेरी” या शब्दांऐवजी आपल्या घरी, आपल्या सासरी, आपल्याकडे, याचा वापर करावा. जेणेकरून सासरची मंडळी ही आपली होतील आणि लवकरात लवकर तुम्ही सासरच्या घराला आपले मानाल.
तर या होत्या काही गोष्टी ज्या मुलींना सुखी संसारासाठी लग्नाआधी माहित असायला हव्यात.
सध्य परिस्थिती :
खरंतर आधी आई मुलींना या सर्व गोष्टी सांगायची आता. त्याची गरज मुलींना भासत नाही. कारण सगळं काही ऑनलाइन उपलब्ध आहे. युट्युब युनिव्हर्सिटी आणि डॉक्टर गुगल यांच्यामुळे बरेच काही पटकन उपलब्ध होते. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.
काहीवेळा मैत्रिणी देखील आपल्याला ज्ञान देतात म्हणा. पण आजकालच्या मुलींचा बराच वेळ फोन बघण्यात आणि सोशल मीडिया वर जातो. हे असे वागणे भांडणास कारणीभूत ठरते. त्यामुळे मुलींनो जरा जपून वागा.
तात्पर्य :
जरी आपल्याला कितीही माहिती असली. तरी प्रत्यक्ष परिस्थिती काय असेल हे आपण आत्ताच सांगू शकत नाही. आपण फक्त तयारीनिशी राहायचं. आपली अस्त्र-शस्त्र घेऊन आणि जशी गरज पडेल, वेळ येईल त्याप्रमाणे त्यांचा वापर करायचा. म्हणजेच त्या माहितीचा वापर करायचा आणि तरीदेखील आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, कुठे अडत असेल.
तर आपल्या आईला, आपल्या मैत्रिणींना, अगदीच नाही तर होणाऱ्या नवऱ्याला, होणाऱ्या सासूबाईकडे आपले मन मोकळे करावे आणि आपल्या ज्ञानात भर टाकून घ्यावी.