मी कुठेतरी वाचलेले think twice before taking any decision. तसंच काहीसे लग्न बाबतीत देखील आहे. कारण लग्न हा एक संवेदनशील विषय आहे. मुलांचे पालक किती तरी चाचण्या ठेवतात. तेव्हा कुठे जाऊन एखादे स्थळ मिळते आणि लग्न होते.
जे प्रयत्न आई वडिलांनी केले तसेच मुलांना जमणार आहे का? जर सर्वस्वी त्यांनाच निर्णय घ्यायला सांगितलं तर आई वडील नक्की म्हणतील हे काय बाजारातून एखादी वस्तू खरेदी करून आणण्यासारखे नाही? इथे एखादे स्थळ तावून सुलाखून काढतात आणि मी मगच लग्नापर्यंत पोहचवतात. मुलांना हे जमणार आहे का?
मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या लग्नाचे निर्णय घेऊ देणे योग्य कि अयोग्य?
यामध्ये जास्तीत जास्त जण म्हणतील नकोच. मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या लग्नाचे निर्णय घ्यायला देऊ नका. चला आपण दोन्ही बाजूंचा विचार करू:
मुलांनी लग्नाचे निर्णय घेऊ नयेत कारण:
- मुलांना तेवढा अनुभव नाही.
- त्यांचे विचार बालिश आहेत आणि अजून त्यांच्यात तो पोक्तपणा किंवा प्रगल्भता आली नाही.
- त्यांचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे.
- मुलांना त्यांचे चांगले कि वाईट काही कळत नाही. मग ते स्वतःचे लग्न कसे जमवणार?
- समाज नावे ठेवेल आई वडील असून सुद्धा जर मुले स्वतःच लग्न जुळवू लागले.
- त्यांच्या फसवणुकीची शक्यता आहे.
दुसरी बाजू जी म्हणते मुलांनी निर्णय घ्यावेत कारण:
- स्वतःची नोकरी शोधली तसे जोडीदार देखील शोधतील.
- त्यांना लक्षात येईल स्थळ शोधणे काय असते.
- त्यांना मुभा मिळे स्वतःचा मनपसंद जोडीदार शोधण्याची.
- त्यांना त्यांचे भले कळते.
- ज्यांना कोणाचा पाठिंबा नाही किंवा आई वडील नाहीत ते स्वतःच शोधणार.
तर हे असे काहीसे आहे.
सत्य परिस्थिती:
खरे पाहता आपल्याकडेच नाही. तर इतर ठिकाणी देखील आई वडील किंवा इतर नातेवाईक मंडळीच लग्न जुळवत असतात. मुलांना फक्त होकार किंवा नकार द्यायचा असतो. सगळं काही त्यांचे पालकच ठरवतात. बऱ्याचदा मुलांना या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो. त्यांना वाटते की ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. पण ते हे विसरतात की त्यांच्या पालकांचा अनुभव त्यांच्या पेक्षा जास्त आहे. हा कदाचित त्यांनी निवडलेल्या स्थळांचे देखील एकदम सगळ बरोबर असेल सांगता येत नाही. पण नक्कीच त्यांचे मार्गदर्शन गरजेचे आहे.
पालकांना नेहमीच वाटते की आपल्या मुलांना अक्कल नाही. त्यांना कोणीही फसवू शकते. त्यामुळे मुलांच्या काळजी पोटी पालकच सगळी जबाबदारी घेतात असे म्हटले तरी चालेल. त्यात काही वावगे नाही. ते त्यांचे कर्तव्यच पार पाडत असतात. पण मुले म्हणून आपण किती कर्तव्य पार पाडतो याचा देखील विचार करायला हवा. आपल्याला आपल्या पालकांचा हस्तक्षेप नको असतो.
तात्पर्य:
मला एवढेच वाटते की मुलांना त्यांच्या लग्नाचा निर्णय घ्यायला द्यावा की नाही हा सर्वस्वी त्यांच्या पालकांचा किंवा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. मी फक्त सुचवण्याचे काम करू शकते. पण मला वाटते की, पालकांनी आणि मुलांनी दोघांनी मिळून हा निर्णय घ्यावा.
कारण फक्त आई वडिलांनी जबाबदारी का पेलायची? मुलांनी देखील आई वडिलांना सपोर्ट करावा. त्यांचे मत विचारात घ्यावे.
मान्य आहे तुम्हाला तुमचे चांगले कळते. पण त्यांच्या मार्गदर्शनाने तुमचे काम अजून सोपे होईल. तसेच वाद ही होणार नाहीत. जी गोष्ट तुम्ही नाही पाहू शकणार ते तुमचे पालक तुम्हाला सांगतील. म्हणून नेहमी मिळून निर्णय घ्या. आई वडिलांच्या दबावाखाली राहून निर्णय घेऊ नका. त्यांच्या सोबत, त्यांच्या बरोबरीने निर्णय घ्या. हाच एकमेव पर्याय म्हणा किंवा मार्ग म्हणा. ज्याने हा तिढा सुटेल की, लग्नाचा निर्णय मुलांना घ्यायला द्यावा की नाही? दोघांना उपेक्षित वाटणार नाही. आई वडील आणि मुले हे एकमेकांना समजून घेण्यात यशस्वी होतील.