लग्न म्हणजेच विवाह. ज्यामुळे दोन जीव एकत्र येतात. पण हे लग्न होण्याआधी त्यांना विविध गोष्टींच्या निकषातून जावे लागते. त्यातील एक म्हणजे लग्न पत्रिका म्हणजेच वधू व वराची जन्म कुंडली. या पत्रिके शिवाय पुढील बोलणे होतच नाही. कारण पत्रिका जुळणे हे देखील सगळ्यात महत्त्वाचे मानले गेले आहे. हल्ली या गोष्टीस फारसे महत्त्व दिले जात नाही. तरी देखील वडीलधारी मंडळी लग्नपत्रिका जुळवण्याचा आग्रह धरतात. चला पाहू लग्न पत्रिका पाहणे किती आवश्यक आहे?
लग्न पत्रिका (कुंडली जुळणे) पाहणे किती गरजेचे?
सर्वात पहिले तर लग्नपत्रिका किंवा आपली जन्म कुंडली ही एक आपल्या जीवनाचा आराखडा आहे, नकाशा आहे. कारण ज्यावेळी एखादा बालक जन्म घेतो. त्यावेळी आकाशात ग्रह , तारे यांचा वेगवेगळा संगम होत असतो.
याचे वर्णन आपल्या जन्मकुंडलीत आपल्याला पहावयास मिळते. जन्म कुंडली मध्ये नऊ ग्रह आणि बारा राशी असतात. ज्या आपल्या जीवनाला प्रभावित करतात. तसेच प्रत्येक ग्रहाचा एक स्वामी असतो आणि त्या ग्रहाचे गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये उतरतात असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे.
त्यामुळे एकाच दिवशी जन्मलेल्या लोकांचे नक्षत्र, ग्रहांची स्थिती हे सर्व काही वेगवेगळे असू शकते आणि म्हणूनच एका दिवशी जन्मलेल्या व्यक्तींपैकी एक राजा असतो किंवा भिकारी पण असू शकतो. एकंदरीतच ग्रहांची स्थिती ही प्रत्येकाच्या जन्माच्या वेळी एकसारखीच असेल असे नाही.
दोन वेगवेगळ्या व्यक्ती आणि वेगवेगळी ग्रह स्थिती अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील पहावयास मिळते. कारण त्यांच्या जन्म वेळेमध्ये सेकंदाचा फरक नक्कीच असतो आणि त्यामुळे ग्रहस्थिती देखील त्या सेकंदाच्या फरकाने बदलत असते.
लग्न पत्रिकेचे महत्त्व:
- लग्न जुळवताना लग्न पत्रिका बघणे हे गरजेचे आहे. कारण इथे ३६ गुणांपैकी किती गुण जुळतात हे तपासून पाहिले जाते. म्हणजेच मुलाची आणि मुलीची पत्रिका नेमकी ३६ गुणांपैकी किती गुणांमध्ये जुळते हे पाहिले जाते.
- यात जर १९ पेक्षा जास्त गुण जुळले तर फारच चांगले असे म्हणतात. म्हणजे संसार सुखाचा होतो असेही म्हणतात. ३०,३२ किंवा ३६ गुण जुळणार असतील तर अतिउत्तम.
- पण बऱ्याचदा याचे उलटे देखील होऊ शकते. ज्यांचे कमी गुण जुळतात त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाते आणि ज्यांचे जास्त गुण जुळतात त्यांचे वैवाहिक जीवन थोडे कष्टमय जाते. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रिका नीट बघावी लागते. काही उपाय करावे लागतात.
- पत्रिकेमध्ये गोत्र पाहणे देखील महत्त्वाचे ठरते. दोघांची गोत्रे सारखे नाहीत ना? नाहीतर त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यत त्रास उद्भवू शकतो. तसेच पत्रिकेमध्ये मंगळदोष आहे का? किंवा इतर काही गोष्टींपासून बाधा आहे का? हे देखील पाहिले जाते.
- आपली पत्रिका ही आपल्या आयुष्याचा एक आरसा आहे. भूतकाळ, भविष्यकाळ यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या या पत्रिकेमध्ये नक्कीच सापडतात यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पत्रिका जुळते की नाही हे पाहिल्यामुळे पुढील त्रास कमी होतात. तसेच जर काही उपाय असतील तर ते सुचवले जातात. त्यामुळे दोघांचेही वैवाहिक आयुष्य सुखी होऊ शकते.
तात्पर्य:
जसे की मी आधी म्हटले हल्ली लग्न पत्रिकेवरचा, जन्म कुंडली वर विश्वास सध्याच्या तरुण पिढीचा नाही आहे. त्यांना हे पत्रिका पाहणे वगैरे वेळ वाया घालवणे असेच वाटते. आता हा त्यांच्या विचारांचा भाग झाला. काहींना ह्यात बोगसपणा, अंधश्रद्धा देखील वाटू शकते. यावरती विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण तरी देखील लग्न करण्याआधी आपली लग्न पत्रिका, जन्मपत्रिका एकदा जुळवून नक्की पहावी. म्हणजे पुढील येणारे अडथळे, त्रास याबाबतीत थोडीफार पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते. त्यावरती योग्य त्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
ज्योतिष शास्त्रात वेगवेगळे उपाय असून त्या उपायांमुळे आपण आपले त्रास कमी करू शकतो आणि आपले वैवाहिक जीवन सुखी व धन्य करू शकतो हे देखील तेवढेच खरे आहे.