माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. मला एक मुलगा आहे. बाळाचे संगोपन उत्तम करण्यासाठी मी नोकरी सोडून दिली.
पती कधी पैसे कमी पडू देत नाहीत. पण खूप अरसिक आहेत.
लग्न दोन जीवांचे नाते. विवाहा मुळे हे दोन जीव आयुष्यभर एकत्र बांधले जातात. प्रत्येक जोडप्याला तसेच त्यांच्या घरातल्यांना वाटत असते की आपल्या संसार हा सुखाचा व्हावा. पण कुठेतरी काहीतरी चुकत असते. दोघांपैकी एकाला काहीतरी कमी वाटत असते आणि मग अशा मध्ये घुसमट सुरू होते. एकांत वाढू लागतो आणि काही वेळेला चुकीची पावले देखील उचलली जातात.
आता वर विचारलेल्या प्रश्नांमध्ये ताईच्या लग्नाला फक्त तीन वर्षे झाली आहेत. तीन वर्षानंतर मुलाची जबाबदारी त्या उत्तम रीतीने पार पाडत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःची नोकरी देखील सोडली आहे. घरात कशाचीच काही कमतरता नाही असे देखील त्यांचे म्हणणे आहे. पण त्यांचे पती त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. ते अरसिक आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
- या अशा प्रसंगांमध्ये एकच सांगावयाचे वाटते ते म्हणजे आपण सर्वात आधी आपल्या पतीबरोबर वेळ घालवावा. जर ते पुढाकार घेत नसतील तर तो पुढाकार तुम्ही घ्यावा. सध्या तुमच्यावरती एका लहान मुलाची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे त्याचे सगळं काही करून तुम्ही थकूनही जात असाल. पण अशावेळी देखील तुम्ही स्वतःला सावरून जर तुमच्या नवऱ्यासाठी देखील तुम्ही वेळ काढत असाल तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल.
- काही काही पुरुष असतात. ज्यांना व्यक्त होणे आवडत नाही. म्हणजेच थोडाफार बुजरा स्वभाव असतो. तुम्हाला जी गोष्ट तुमच्या पतीकडून अपेक्षित आहे किंवा हवी आहे ती गोष्ट तुम्ही करून पहा. तुम्ही त्याला प्रेमाने चार शब्द बोला. त्याची स्तुती करा. त्याला भेटवस्तू द्या. खरं तर हे स्त्रियांना आवडत नाही. त्यांना नेहमीच वाटते की आपल्या पतीने हे सर्व करावे. त्याने पुढाकार घ्यावा. अगदी शारीरिक संबंधात देखील पतीने पुढाकार घ्यावा. पत्नीने नाही. पण काही पुरुषांच्या बाबतीत यामध्ये जरा विरुद्ध घडू शकते आणि त्यासाठी मी म्हणत आहे की ताईंनी स्वतः जर प्रयत्न केले तर कदाचित ही समस्या सुटू शकते. कधीतरी मुलाला तुमच्या आई-वडिलांकडे किंवा सासू-सासऱ्यांकडे ठेवा आणि तुमच्या पतीबरोबर तुम्ही फिरायला जा. थोडा वेळ त्यांना द्या. त्याला खुश करण्याचे प्रयत्न करा.
- आधी तुम्ही नोकरी करत होतात. त्यामुळे कदाचित तुमचे फारसे बोलणे चालणे होत नसायचे. कारण आधी तुम्ही दोघेही एका ठराविक वेळेसाठी घराच्या बाहेर कामाला जात होता. आता सध्या तुम्ही पूर्ण वेळ घरात असता आणि तुमचे पती मात्र एका ठराविक वेळेसाठी कामासाठी बाहेर जातात.
- त्यानंतर ते घरात आले की सर्वप्रथम त्यांनी तुम्हाला प्राथमिकता द्यावी असे वाटणे साहजिकच आहे. पण कदाचित त्यांना देखील कामाचे व्याप असू शकतात. ज्यामध्ये तुमच्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून तुम्ही थोडेफार प्रयत्न करून बघा आणि जर या प्रयत्नातून काहीही निष्पन्न झाले नाही. तर मग मात्र तुम्ही त्यांना थेट विचारू शकता की नेमकी समस्या काय आहे? काय केले तर त्याला बरे वाटेल किंवा तुम्ही काय करावे? अशी त्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि या संवादातून देखील काहीही निष्पन्न झाले नाही आणि जर तुम्हाला काही वेगळीच शंका येत असेल. तर तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेऊ शकतात किंवा एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीला विश्वासात घेऊन हे सर्व सांगू शकता.
- त्यांच्याकडून देखील तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल. जर तुम्हाला घरातील व्यक्तींचा ही सल्ला नको असेल. तर तुम्ही समुपदेशनाचा मार्ग देखील निवडू शकता. तिथून देखील तुम्हाला योग्य तो सल्ला नक्कीच मिळेल. त्यामुळे हताश न होता या समस्येतून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करा.