विवाह एक अद्भुत सोहळा ज्याने दोन अनोळखी व्यक्तींची सुंदर अशी रेशीमगाठ आयुष्यभरासाठी बांधली जाते.
असे म्हणतात कि, विवाहामुळे दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंबे देखील एकत्र येतात. एकदम बरोबर. हळू हळू हे नाते खुलत जाते, अनुभवांनी आणि विचारांनी अजून प्रगल्भ होत जाते.
हल्लीच्या आधुनिक विवाहांमध्ये दोन्ही कुटुंबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी पाहायला मिळतो. त्यात भर पडते ती या दोघांच्या आशा अपेक्षांची. या सगळ्या स्थितीमधून बाहेर पडून काही जण बोहल्यावर चढण्यात यशस्वी होतात. म्हणजेच त्यांचे लग्न होते. पण हल्लीचे आधुनिक विवाह का अयशस्वी होत आहेत? काय करणे असू शकतात? ते या लेखात आपण पाहू:
आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?
- अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. या अपॆक्षा फक्त मुला मुलींच्याच नाहीत. तर त्यांच्या आई वडिलांच्या देखील आहेत आणि त्या पण अवास्तव, उगीच वाढीव अपेक्षा ठेवल्याने मनासारखे जोडीदार मिळत नाहीत आणि मग लग्नाची योग्य वेळ निघून जाते. मग नंतर कुठेतरी तडजोड करून लग्न करण्यात येते. जे बऱ्याचदा मनासारखे असे नसते. कारण अपेक्षेप्रमाणे स्थळ नाही म्हणून आयुष्यभर खंत मनात राहते. त्यात मग जोडीदाराबरोबर जमत नाही म्हणून गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहचते.
- हल्लीच्या मुली देखील खूप शिकतात आणि त्यांच्या शिक्षणाला साजेसे असे स्थळ मिळणे कठीण होते. आणि नंतर एखादया कमी शिकलेल्या स्थळावर तडजोड करावी लागते. तसेच काही वर्षानंतर त्यांना आपला जोडीदार आपल्याला योग्य नाही असे वाटू लागते आणि मग सगळं संपते.
- बऱ्याचदा घरातल्यांच्या अति हस्तक्षेपामुळे देखील गोष्ट म्हणजेच लग्न तुटण्यापर्यंत जाऊ शकते.
- हल्लीच्या मुलं मुलींमध्ये समजूतदारपणा देखील नाही.
- वाढीव वयामुळे तडजोड करण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे एखादी मनाविरुद्ध घटना घडली कि हल्लीची मुले मुली सरळ बंड करतात.
- माघार घेणे, नमते घेणे हे हल्लीच्या जोडप्यांना जमत नाही. ते त्यांना कमी पणाचे वाटते.
- मुलगा, मुलगी दोघंही नोकरी करतात आणि स्वतः ला सिद्ध करण्याचा पूरेपूर प्रयत्न करत असतात. त्यामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. मग त्या वरून वाद, भांडणे किंवा गैरसमज निर्माण व्हायला लागतात.
- छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असतात.
तर हि होती काही कारणे ज्यामुळे आधुनिक विवाह म्हणजेच हल्लीचे विवाह अयशस्वी होतात.
पूर्वी विवाह का यशस्वी व्हायचे?
- घरातील वडीलधारी माणसे पुढाकार घेऊन लग्न ठरवायचे आणि मुलगा, मुलगी ते मान्य करायचे त्यांना कोणीही त्यांची पसंती विचारायचे नाही.
- एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती आधी होती.
- तडजोड तसेच समजुदारपणा होता.
- घरातील वडीलधारी व्यक्तींचा धाक होता.
- एकत्र कुटुंब पद्धतीमुळे अनेक कुटुंबे एकत्र राहत होती. त्यामुळे एकमेकांचे मार्गदर्शन लाभत होते, संकटसमयी कुटुंबाची मदत मिळत होती.
अशी अजून बरीच करणे असतील. ज्यामुळे आधी विवाह यशस्वी व्हायचे.
यशस्वी विवाहा साठी काय करावे?
- आधी मुलींना एवढे स्वातंत्र्य नव्हते, शिक्षण देखील कमी होते. हळू हळू प्रगती झाली आणि मुलींना देखील शिक्षण मिळू लागले. आता तर त्या नोकरी देखील करतात. स्वतः च्या पायावर उभ्या आहेत. सर्व ठीक तरी देखील कुठे तरी काहीतरी कमी पडते. त्यामुळे हल्लीचे विवाह अयशस्वी होत आहेत.
- कारणे काहीही असोत. पण संसार म्हटला कि चढ उतार हे आलेच. याला दोघांनी एकत्र तोंड दिले पाहिजे.
- शेवटी संपूर्ण आयुष्य तुम्हाला एकत्र घालवायचे आहे. लग्नाच्या कित्येक वर्षांनी मुले बाळे झाल्यावर वेगळे कसे व्हावेसे वाटते? अजबच म्हणावे लागेल.आपले लग्न कसे टिकवायचे? ते व्यशस्वी करायचे कि नाही? ते आपल्याच हातात आहे. त्यासाठी दुसरे फक्त आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. बाकी त्या नात्याचा आदर करणे, ते टिकवून ठेवणे हे तुम्हालाच करायचे आहे.
- तेव्हा हल्लीच्या जोडप्यांची विवाह बंधनात बांधले जाण्यापूर्वी समुपदेशन घ्यावे. ज्याने त्यांना स्वतःच्या जोडीदाराला अजून व्यवस्थित ओळखता येईल. जे काही असेल शेवटी एव्हढेच सांगेन की आपल्या जोडीदाराला समजून घ्या. सांभाळून घ्या आणि एकमेकांना साथ द्या.