प्रत्येक पालकांची एकच इच्छा असते. आपल्या मुलांचं भलं व्हावं. त्यांना योग्य तो जोडीदार मिळावा. योग्य वयात त्यांचे लग्न व्हावे आणि पुढे त्यांचा संसार फुलावा. यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू असतात.अगदी स्थळ शोधण्यापासून ते लग्न लागेपर्यंत सगळी जबाबदारी पालक आपलं आद्य कर्तव्य म्हणून पार पाडतात.मुलांच्या सुखी संसाराला वाढताना पाहतात. पण बऱ्याच अंशी असे दिसून येते की लग्न झाल्यानंतर नुसती भांडण, क्लेश इत्यादींचा सामना त्यांना करावा लागतो. काही ठिकाणी हे नसेलही. पण मग मुलाचे लग्न झालेल्या आजकालच्या आई-वडिलांनी नेमकं कसं वागावं हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरतं. चला तर पाहूया या लेखामध्ये.
आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?
- सर्वप्रथम लग्न झाल्यानंतर सतत मुलाच्या संसारात ढवळाढवळ करू नये. होता होईपर्यंत आपण लांबच राहावं. मी हे नाही म्हणत की जर तुम्ही एकत्र कुटुंब म्हणून राहत असाल तर तुम्ही वेगवेगळ राहावं. तुमची लुडबुड मुलाच्या संसारात नसावी.
- मुलाने घेतलेल्या निर्णयांमध्ये आपण स्वतःहून स्वतःचे मत मांडू नये. जर तुम्हाला तो निर्णय पटला नसेल तर मुलाला तुम्ही नंतर तसे सांगू शकता. तुमचा मुलगा स्वतःहून तुमच्याकडे एखादा निर्णय घेण्यासाठी सल्ला मागायला आला तर तुम्ही दोघं मिळून त्यावरती चर्चा करून त्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत करू शकता.
- तसेच आई-वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये आर्थिक व्यवहार करताना देखील थोडीशी खबरदारी असावी. जरी तो आपला मुलगा असला तरी तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्याला त्याचा संसार आहे. या सर्व गोष्टी पाहता खर्चाची बाजू किंवा अजून काही आर्थिक अडचणी याबतीत पारदर्शी असलेले बरे.
- सर्व गोष्टींवर ती स्पष्टपणे त्याच्याशी बोलणे महत्त्वाचे ठरेल. अन्यथा मुलगा तुम्हाला गृहीत धरेल की जे आई-बाबांचे आहे ते माझेच आहे. ते आहे देखील. पण ते त्याला सांगावे की आता तू तुझा स्वतःचा संसार कर. आम्ही आहोत तुला गरज पडली तर.
- दुसरी गोष्ट म्हणजे आई-वडिलांनी मुलाला मार्गदर्शन करावे. पण त्यांचा अट्टाहास नसावा की मुलाने हेच करावे, तेच करावे किंवा मुलाने असेच वागावे वगैरे वगैरे. कारण हे लक्षात असूद्या की मुलाला मार्गदर्शन महत्त्वाचे आहे किंवा तुमचा सल्ला महत्त्वाचा आहे. तो ते कितपत घेतो यावरती जास्त लक्ष न देणे. नाहीतर तुम्हाला वाईट वाटेल की त्याने माझे ऐकले नाही म्हणून.
- तुम्ही फारशी अपेक्षा ठेवू नये की लग्नानंतर मुलं आपलं ऐकतीलच.
- अजून एक महत्त्वाचे म्हणजे उगीच मुलाचे कान भरू नयेत. नवरा बायको मध्ये भांडण लावून देऊ नयेत.
- अवास्तव अपेक्षा आपल्या मुलांकडून किंवा आपल्या सुनेकडून ठेवू नयेत. कारण अपेक्षा भंग होण्याचे दुःख सर्वात जास्त असते.
- लग्न झाल्यानंतर मुलाला सांगावे की बाबा आता तुझा संसार आहे हा तुलाच बघायचा आहे. सगळं घर, खर्च, जबाबदाऱ्या वगैरे.
- आधीच सर्व गोष्टीची त्याला जाणीव करून दिली तर तो त्या दृष्टीने त्याची तयारी करेल व तशी त्याची मानसिक तयारी देखील असेल आणि पुढील मनःस्ताप टाळता येऊ शकतो.
- थोडेफार एक पाऊल मागेच राहा.
- जर त्याला तुमच्या मदतीची गरज वाटली तर तो नक्कीच तुम्हाला सांगेल. तेव्हा मग तुम्ही तुमच्या मुलासाठी तयार राहा.
तर ह्या अशा काही पद्धतीने लग्न झाल्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी वागावे.
सत्य परिस्थिती:
आताच्या काळात लग्न झाल्यानंतरही मुलाला व त्याच्या बायकोला आई वडील सांभाळत असतात किंवा पोसत असे म्हणा. पालकांना वाटते की लग्न लावून दिले म्हणजे तो जबाबदारी पाडेल. पण जोपर्यंत पालक ही जबाबदारी स्वतःहून मुलाच्या खांद्यावरती टाकत नाहीत तोपर्यंत तो जबाबदार कसा बनणार? आता तो काही लहान नाही. त्यात जरा काही अडचणी आल्या, जरा काही मुलाला त्रास झाला, तर पालक अगदी देवदुता सारखे मदतीस धावून जातात.
मुलांना देखील थोडेफार चटके सहन करू द्या, संसार कसा करायचा हे शिकू द्या, अनुभव घेऊ द्या. तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. पण सतत पुढे पुढे करू नका. अशाने त्यांना आयती सवय लागेल आणि ते स्वतःची जबाबदारी विसरतील.
शेवटी एवढेच सांगेन की लग्न झालेल्या मुलाला त्याची स्वतःची जबाबदारी ओळखू द्या, घेऊ द्या आणि पार पाडू द्या. तुम्ही मात्र त्याचे आधारस्तंभ म्हणून नेहमी त्याच्या पाठीशी उभे रहा.