साडेतीन मुहूर्तांमधील एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय तृतीया या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा झालाच तर तो म्हणजे अक्षय आणि तृतीया. अक्षय म्हणजेच कधीही क्षय किंवा कधीही न संपणे. तसेच तृतीया म्हणजेच तीन. पण ही तृतीया तर प्रत्येक महिन्यात असतेच.
मग अक्षय तृतीयाच का? चला या प्रश्नाचे उत्तर पाहूया
वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) का आहे महत्वाची?
वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. कारण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला महत्त्व आहे. इतर महिन्यात येणाऱ्या तृतीयेला नाही आणि जसे आधी म्हटले की हा एक साडेतीन मुहूर्तांमधील मुहूर्त देखील मानला गेला आहे.
या दिवसाचे महत्व अनन्य साधारण असे आहे. कारण या दिवशी आपण जी काही गोष्ट करू ती कधीही संपणार नाही. तिचा कधीही क्षय होणार नाही. ती कधीही कमी पडणार नाही आणि म्हणूनच या दिवशी जर आपण अक्षय तृतीयेचे व्रत केले तर ते आपल्यासाठी फार लाभदायी ठरू शकते.
अक्षय तृतीयेच्या व्रताची आणि पूजेची थोडक्यात माहिती
वैशाख महिना, शुक्ल पक्ष आणि तृतीया यांचा अद्भुत मेळ म्हणजेच अक्षय तृतीया होय. या दिवशी लक्ष्मी नारायणाचे पूजन करतात. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील साजरी करतात.
- या दिवशी देवी अन्नपूर्णा देवीचे देखील पूजन करतात. एका चौरंगावर किंवा पाटावर गणपती, लक्ष्मी, विष्णू आणि देवी अन्नपूर्णा यांच्या मुर्त्या ठेवून त्यांची शोडोपचारे पूजा केली जाते.
- तसेच या दिवसांमध्ये किंवा या दिवसापासूनच आंबा खायला देखील सुरू करतात.
- त्यामुळे कैरी, आंबा याचे नैवेद्य देखील दाखवले जातात. तसेच अजून एका चौरंगावरती मातीच्या भांड्यात माती घेऊन त्यावर गहू पेरून ठेवावे. याची धारण अशी की काही ठिकाणी आजच्या दिवसापासून पेरणीला सुरुवात होते. जमीन पेरणीसाठी तयार केली जाते.
- त्यावरती एक पाण्याने भरलेले माठ ठेवावे. पाणी हे स्वच्छ असावे कारण पूजा झाल्याच्या नंतर हे माठ गरजूंना दान करायचे असते. त्या पाण्यामध्ये तुळशी पत्र टाकावे. माठाच्या भोवती पंचरंगी धाग्याचे सम कंकण बांधावे. या माठावर आंब्याचे डहाळे ठेवावे आणि त्यावर अजून एक छोटे मडके ठेवावे. त्यात आंबा ठेवावा आणि थोडे तांदूळ घालावे.
- त्यानंतर त्या वर एक खरबूज ठेवावा. या सगळ्याची पूजा करावी. हे प्रतीकात्मक रूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश होय.
- त्यानंतर नैवेद्य दाखवून पितरांसाठी हवन केले जाऊ शकते. त्यासाठी हवन कुंडात शेणाच्या गोवऱ्या, काळे तीळ, कपूर आणि तूप याचा वापर करावा.
- तसेच यात नैवेद्याची देखील आहुती द्यावी आणि पितरांना आवाहन करावे की त्यांनी आपल्या चुकांना क्षमा करावी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या वर ठेवावेत.
तर अशा पद्धतीने आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करू शकतो. या दिवशी उपवास केलेला फार चांगला. सकाळी लवकर उठून स्नान करून मगच पूजा केली जाते.
अक्षय तृतीये ला काय दान करावे?
असे म्हणतात त्या दिवशी दान करावे. गरजूंना पाण्याने भरलेला माठ दान करावा. उन्हाची झळ लागू नये म्हणून छत्री दान करावी किंवा पायातल्या चपला दान कराव्यात. या दिवशी दानाचे खूप महत्त्व आहे.
अक्षय तृतीये ला काय कामे करावित?
एवढेच नाही तर आपण या दिवशी सोन्याची खरेदी करावी. नवीन कपडे घ्यावेत, ते परिधान करावेत. याच दिवशी वाहन खरेदी म्हणा किंवा नवीन घर घेणे किंवा गृह प्रवेश करणे देखील शुभादायक मानले जाते. हा एक स्वयं सिद्ध असा मुहूर्त आहे. कारण हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो. या दिवशी आपण कोणतेही काम सुरू करू शकतो. जसे की नवीन मंडळांची स्थापना करणे किंवा नवीन कार्य सुरू करणे देखील फार चांगले मानले गेले आहे.
या दिवसाचे अजून एक महत्त्व म्हणजे या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण जप किंवा नामस्मरण केले तर त्याचे पुण्य खूप मिळते. ते कधी ही कमी पडत नाही. क्षय होत नाही. तर अधिक वाढते आणि म्हणूनच या दिवशी शुभ बोलावे. कारण वाईट वृत्ती किंवा विचार देखील या दिवशी केला किंवा भांडणे, क्लेश केला तर तो ही कधी कमी पडणार नाही. म्हणून या शुभ दिवशी आपण आनंद दायी असावे. म्हणजेच आनंदाचा आपल्या आयुष्यात कधी ही क्षय होणार नाही.