लग्न होण्याआधी एका समारंभाला खूप महत्व दिले आहे. तो म्हणजे हळदीचा समारंभ. जो खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो.
आपल्या हिंदू विवाह पद्धतीमध्ये हळदीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. नुसतेच लग्नात नाही तर रोजच्या वापरात देखील हळदीने आपले स्थान निर्माण केले आहे. एखादी जखम झाली कि सगळ्यात आधी त्यावर हळद ठेवली जाते. हळदीचे पवित्र आणि औषधी गुणधर्म बरेच आहेत.
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का लग्नाआधी हळद का लावली जाते? किंवा हळद हा विधी का करतात? चला तर पाहूया
- लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आणि मुलगी हे सगळ्यांमध्ये उठून दिसायला हवेत. त्यामुळे हळद लावल्याने त्यांच्या त्वचेवर एक चमक येते आणि त्यांचे सौंदर्य खुलून दिसते. कारण हळदी मध्ये औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे त्वचा उजळते, स्वच्छ होते.
- आधीच्या काळी ब्युटी पार्लर वगैरे नव्हते. त्यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी देखील हळदीचा वापर होतो.
- पिवळा रंग हा प्रेमाचा, त्यागाचे, ऐश्वर्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे हळद हा विधी करताना देखील नवरा मुलाला किंवा मुलीला पिवळे वस्त्र परिधान करावे लागते.
- हळदीचे धार्मिक महत्व देखील आहे. जसे कि हळदी कुंकू मध्ये देखील हळद वापरतात. सर्वच शुभ कार्यात हळदीला मान आहे. एवढेच नव्हे तर लग्नात विधी करताना हळकुंड देखील हातात बांधले जाते. त्यामुळे हळद हि पवित्र मानली गेली आहे. म्हणून वधूला आणि वराला हि हळद लावली जाते असे म्हणण्यास हरकत नाही.
- जसे मी आधी म्हटले कि हळद हि औषधी असून तिला आयुर्वेदात खूप महत्वाचे स्थान आहे. स्त्रियांना मासिक पाळीत सुरळीत होण्यास मदत होते आणि प्रजनन क्षमतेमध्ये मदत करते. हि हळद त्यामुळे कदाचित नव वधूस लावली जाते.
- वर आणि वधूला दृष्ट लागू नये. म्हणून देखील हळद लावली जाते.
हळद कशी लावतात?
हळकुंड वाटून किंवा तयार हळद एका वाटीत एकजीव केली जाते आणि मग आंब्याच्या पानांनी पाच सवाशिणींना बोलवुन करतात. वधूला किंवा वराला हळद लावण्या आधी त्यांना ओवाळतात आणि मग खालून वर पर्यंत पाच वेळा हळद लावली जाते. त्यास हळद चढवणे असे म्हणतात.
लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरवली जाते. एकदा का हळद लागली कि वधूला आणि वराला घराबाहेर पडू देत नाहीत. हळद उतारवल्यानंतर ते घराबाहेर पडू शकतात.मुलाची उष्टी हळद मुलीला लावतात आणि मुलीची उष्टी हळद मुलाला लावतात.
तात्पर्य:
तर अशी हि गुणकारी हळद आपल्या सर्वांच्या ओळखीची आणि महत्वाची. ज्यामुळे हळदी समारंभ पार पडतो. हळदी समारंभामुळे लोकांमध्ये म्हणा किंवा परिवारामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. ज्यामुळे घरातल्या लोकांना थोडी मजा मस्ती करायला मिळते आणि त्यांचा ताण तणाव दूर होण्यास देखील मदत होते. लग्नाआधी हळद हा विधी करणे जवळपास सर्वच ठिकाणी आणि सर्वच राज्यात होतो. हळदीच्या कार्यक्रमापासून खरी लग्नाची तयारी सुरु होते असे म्हटले तरी चालेल.
सध्या हळदीच्या कार्यक्रमात एक नवे स्वरूप आले आहे ते म्हणजे दारूच्या पार्ट्या आणि मांसाहार वगैरे. कशाचाही अतिरेक नसावा. कारण हा एक पवित्र समारंभ आहे. त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणे योग्य नव्हे. पण हल्ली सगळीकडे तेच दिसते. काहीच ठिकाणी योग्य पद्धतीतमध्ये आणि साधेपणाने हळद साजरी केली जाते. तसेच अनेकदा लग्नाच्या दिवशीच सकाळी हळद उरकतात आणि मग नवरा मुलगा आणि मुलीची अंघोळ उरकून लगेच लग्न लावले जाते.
तर सांगायचा उद्देश हा कि आपण एखादा समारंभ करत आहोत. जो पारंपरिक रित्या पार पडला तर फार छान होईल. कारण पूर्वीच्या काली असे काही धिंगाणे घातले नाही जायचे. त्यामुळे आपण सुसंस्कृत माणसे असून संस्कृती जपणे हे देखील आपले कर्तव्य आहे.