लग्न करण्याआधी आपण बऱ्याच गोष्टी पडताळून पाहतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची ठरते ती म्हणजे जन्मपत्रिका. मुलाची व मुलीची जन्मपत्रिका जुळवून घेतली जाते. त्यात जर एखादा दोष आढळला तर तो दूर करण्यासाठी उपाय केले जातात. परंतु एक असा दोष आहे जर तो पत्रिका जुळवताना आढळला तर लग्न टाळण्याचा सल्लाच दिला जातो. तो म्हणजे नाडीदोष. आता या लेखामध्ये पाहूया हे नाडीदोष काय आहे? नाडी दोष असल्यास आणि लग्न केल्यास काय समस्या येऊ शकतात?
नाडी दोष: प्रकार, समस्या व उपाय
नाडी दोष असल्यास आणि लग्न केल्यास काय समस्या येऊ शकतात?
ज्योतिष शास्त्रात नाडीचे तीन प्रकार आहेत.
- आदी
- मध्य
- अंत्य
आपल्या सर्वांची नाडी वरीलपैकी एकतरी प्रकारात नक्कीच मोडते. प्रत्येक नाडीची काही नक्षत्रे आहेत. ती आता पाहूया.
- आदी नाडी असल्यास अश्विनी, आद्रा, पुनर्वसू, हस्त, ज्येष्ठा, मूळ, उत्तराफाल्गुनी, शतभिषा व पूर्व फाल्गुनी इत्यादी पैकी कोणत्याही नक्षत्रात जर मनुष्याच्या जन्माच्या वेळी चंद्र असेल तर त्या व्यक्तीची आदी नाडी असते. या नाडीवर जन्म घेतलेल्या मनुष्याची वातप्रवृत्ती असते. तसेच या नाडीवर ब्रह्माचे अधिराज्य असते.
- मध्य नाडी मध्ये भरणी,पुष्य, मृगशिरा, पूर्व फाल्गुनी, चित्रा, पूर्वाषाढा , धनिष्ठा, अनुराधा, उत्तरा भाद्रपद यापैकी नक्षत्रामध्ये मनुष्याच्या जन्माच्या वेळी चंद्र असेल तर मध्य नाडी असते. या नाडीवर जन्म घेतलेल्या मनुष्याची पित्त प्रवृत्ती असते. तसेच या नाडीवर विष्णूचे अधिराज्य असते.
- अंत्य नाडी असल्यास कृतिका, आश्लेषा, मेघा, रोहिणी, स्वाती, उत्तराषाढा, विशाखा, रेवती, श्रावण यापैकी कोणत्याही नक्षत्रात मनुष्याच्या जन्माच्या वेळी चंद्र असेल तर त्याची अंत्य नाडी असते. या नाडी वर जन्म घेतलेल्या मनुष्याची प्रवृत्ती कफ असते. तसेच या नाडीवर शिवाचे शासन असते.
नाडी दोष म्हणजे काय?
पत्रिका जुळवताना किती गुण जुळतात हे पाहिले जाते. नाडीदोष म्हणजेच मुलाची व मुलीची नाडी एकच असेल तर त्याला नाडीदोष असे म्हणतात. पत्रिकेमध्ये नाडीला जर शून्य गुण मिळाले. तर तो नाडीदोष मानण्यात येतो. ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे नाडीचे तीन प्रकार आहेत.
तसेच आयुर्वेदातदेखील माणसाच्या तीन प्रवृत्ती आहेत. त्या म्हणजे वात प्रवृत्ती, पित्त प्रवृत्ती आणि कफ प्रवृत्ती. आपण कधी जर आयुर्वेदाचार्यांकडे गेलो तर ते आधी आपली नाडी तपासतात. म्हणजेच मनगटावर बोट ठेवून नाडीचे ठोके ऐकले जातात.
त्यावरून आपली प्रवृत्ती म्हणजेच वात, पित्त, कफ यापैकी नेमकी कुठची आहे ते कळते. आपल्या पत्रिकेत देखील हेच दाखवले जाते. त्यामुळे आयुर्वेद आणि ज्योतिष शास्त्र या दोन्ही मधील नाडी परीक्षण जवळपास सारखेच आहे. म्हणजेच आयुर्वेद आणि ज्योतिष शास्त्र यामध्ये एकरूपता आहे.
नाडी दोष असल्यास आणि लग्न केल्यास काय समस्या येतात?
- जसे आत्ताच म्हटले की वरील तीन पैकी कोणतीही एक नाडी जर वधू आणि वर यांच्या पत्रिकेत असेल तर त्यांची प्रवृत्ती देखील सारखीच असणार म्हणजेच कफ प्रवृत्ती, वात प्रवृत्ती, पित्त प्रवृत्ती इत्यादी.
- त्यामुळे या एकाच प्रवृत्तीमुळे त्यांच्यापासून होणाऱ्या अपत्यास काही त्रास होऊ शकतो.
- बऱ्याचदा अशी संतती शारीरिक मानसिक त्रास घेऊन जन्माला येऊ शकते. म्हणून एक नाडी विवाह करू नये असे सांगितले जाते.
- अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे जर नवरा-बायको दोघांची नाडी एक असेल तर प्रवृत्ती देखील एक असणार व दोघांनाही शारीरिक आजार सारखेच असणार. त्यामुळे एकाच वेळी दोघांनाही एक सारखेच त्रास उद्भवू शकतात.
- एवढेच नव्हे तर शारीरिक संबंध ठेवताना देखील त्रास होऊ शकतो.
नाडी दोष अपवाद:
- नाडी दोष असताना देखील काही अपवाद आहेत. ते म्हणजे वधू आणि वर एकाच राशीचे आहेत. पण त्यांची जन्मनक्षत्र वेगळी आहे. या स्थितीत नाडी दोष ठरत नाही.
- तसेच वधू आणि वर यांचे जन्म नक्षत्र सारखे आहे. पण राशी मात्र वेगवेगळ्या आहेत. याही स्थितीत नाडी दोष नसतो.
उपाय:
खरे तर एक नाडी विवाह हा नेहमी टाळला जातो. मुला मुलीची एकच नाडी असेल, नक्षत्र पण एक असेल, पण राशी मात्र वेगवेगळ्या असतील तर ज्योतिषांचा सल्ला घेऊन मगच लग्न करावे. जर लग्न झालेच असेल तर दोष काही प्रमाणात दूर करण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात.
- महामृत्युंजय मंत्राचा जप करणे.
- स्वतःच्या वाढदिवसा दिवशी गरिबांना अन्नदान करावे.
- अशा जोडप्यांनी शिव उपासना करावी.
- लघुरुद्र किंवा महारुद्र वर्षातून एकदा नक्की करावा.