लग्न होण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ते आपण सर्वांनाच माहित आहे.अशामध्ये प्रत्येक सासरच्यांचा म्हणा किंवा मुलाच्या म्हणा बऱ्याच अपेक्षा असतात, महत्वाची म्हणजे आपली होणारी बायको सुगरण असावी,तिला जेवण बनवता आले पाहिजे,वेगवेगळे पदार्थ तिने बनवावेत इत्यादी.
मुलीला स्वयंपाक येत नसेल तर लग्न झाल्यानंतर मुलीने काय करावे:
सगळ्यात पहिले तर मुलीने आपल्या सासरी आधीच सांगावे की, आपल्याला जेवण व्यवस्थित बनवता येत नाही. कारण सासरची माणसे हे गृहितच धरून असतात की, मुलीला स्वयंपाक करता येतो. त्यामुळे त्यांचा हा गोड गैरसमज मुलीने आधीच दूर करावा आणि त्यांना हमी द्यावी की तिला स्वयंपाक शिकायची इच्छा आहे.
इथे एक आवर्जून सांगावेसे वाटते की खास करून सासू कडून तुमच्या माहेरच्या माणसांचा उदो उदो होणार की, त्यांनी काय शिकवले तुम्हाला? तसेच तुम्हाला स्वयंपाक शिकवताना देखील टोमणे मारले जातील हे ही लक्षात असू द्या. हे सगळे तुम्ही ऐकून घेतले पाहिजे, त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी नाहीतर पुन्हा भांडणे, वाद होतील.
मुलीला लग्नानंतर खालील गोष्टी करता येतील
- ऑनलाइन कुकिंग क्लास लावावा.
- सासूबाई किंवा इतर मंडळींकडून स्वयंपाक शिकून घ्यावा.
- स्वतःच्या आई कडून देखील स्वयंपाक शिकावा जेव्हा कधी आई कडे जाणे होईल तेव्हा
- स्वयंपाकाची पुस्तके वाचावीत आणि नवीन पदार्थ बनवून पहावेत.
- जास्तीत जास्त वेळ किचन मध्ये कसा घालवता येईल ते पाहावे.
- स्वयंपकच्या तयारीत देखील मदत करावी कारण ती सुद्धा एक महत्वाची पायरी आहे.
पाकशास्त्र हाही एक महत्वाचा विषय:
खरे पाहता हल्लीच्या मुलींना स्वयंपाकाची सवय नाही. जास्तीत जास्त वेळ त्यांचा अभ्यास आणि नोकरी यामध्ये जात असल्यामुळे त्यांना जेवण तयार करण्यासाठी वेळच उरत नाही.
आई सतत त्यांना बोंबलत असते की जरा तरी त्या किचन मध्ये वाकून बघ. स्वतः पुरते तरी जेवण बनवता येऊ दे.
आईला वाटते की आपल्या मुलीने सासरी जाण्याआधी पूर्णपणे तयारी करावी नंतर तिला तिथे कोणी बोलू नये. परंतु, तसे न होता मुली पाकशास्त्र याविषयाकडे दुर्लक्ष करतात.
आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सुखी संसाराचा कानमंत्र हा पोटातून जातो. घरतल्यांचे पोट भरलेले असेल आणि आपला जोडीदार पण तृप्त होत असेल तर घरची लक्ष्मी देखील खुश होईल. आपल्याकडे बायकांना अन्नपूर्णा म्हटले आहे. कारण त्या घरातल्यांना तृप्त करतात. मग घरच्या सुनेने तिचे हे कर्तव्य पाळायला नको का?
तात्पर्य:
शेवटी एवढेच की लग्न होऊन येणाऱ्या प्रत्येक मुलीने सुगरण असावे असा हट्ट नाही. पण घरातल्यांची, त्यांच्या जेवणाची जबाबदारी तिने उत्तमपणे सांभाळावी. जेणेकरून तिच्या आई वडिलांना देखील तिचा अभिमान वाटेल. तसेच सासरची सर्व मंडळी देखील खुश होतील.
कोरोना काळात पौष्टिक आहारचे महत्व सगळ्यांना माहीतच झाले असेल. मग हा स्वयंपाक किंवा ही पाककला अवगत असणे किती गरजेचे आहे. इतरांसाठी नाही पण स्वतः साठी तरी स्वयंपाकात रुची असावी. अजून एक गोष्ट म्हणजे सर्व मुली जशी इतर क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. तसेच स्वयंपाक करण्यात देखील चांगली कामगिरी करावी.
जर आपल्याला जेवण बनवता येत नसेल तर सासरी तसे सांगावे. त्यात घाबरण्यासारखे किंवा कमीपणा वाटण्यासारखे काहीच नाही. सासरचे नक्कीच समजून घेतील आणि तुम्हाला स्वयंपाक बनविण्यास शिकवतील. तुम्ही देखील शिकण्याचा उत्साह दाखवा एव्हढेच. जर या गोष्टीत पडायचे नसेल आणि तुम्हाला त्याचे वाईट वाटत असेल तर आधीच स्वयंपाक बनवणे शिकून घ्यावे म्हणजेच ही वेळ येणार नाही.