दीप अमावस्या म्हणजे नक्की काय?
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावास्या म्हणजेच दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या होय. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या असते. जिथे आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवशी पासून श्रावण सुरू होतो. असे म्हणतात की श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांसाठी आपण दिवे वापरतो त्या दिव्यांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या.
दीप अमावस्या काय केले जाते ?
- दीप अमावस्या, आषाढी अमावस्या, या दिवशी शंकराचे, पार्वतीचे आणि कार्तिकेचे पूजन करतात.
- काही ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते. या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील घातल्या जातात.
- तसेच या दीप अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील दाखवला जातो, असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
- गरुड पुराणानुसार जर आषाढ अमावस्येचे आपण व्रत केले, पूजा केली, तर सर्व प्रकारच्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते.
- या दिवशी दान देखील केले जाते. जर आपण आपल्या पूर्वजांचे नावाने दान केले तर ते देखील शुभ मानतात.
- या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते.
- या दिवशी तुळशीचे, पिंपळाच, केळी, लिंबू या झाडांची रोपटी देखील लावली जातात. त्याने आपला ग्रहदोष शांत होऊ शकतो.
- असे म्हणतात याच दिवशी माशांना पीठ म्हणजेच पिठाचे गोळे खायला घातले देखील शुभ मानले जाते.
आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या च्या दिवशी पूजा कशी करावी?
या दिवशी आपल्या घरात जेवढे दिवे असतील ते सगळे घासून घ्यावेत. समया, निरांजने, इतर छोटे मोठे दिवे, व्यवस्थित स्वच्छ करून पाटा वरती मांडावेत. पाटाभोवती रांगोळी काढावीत. सर्व दिव्यांमध्ये तेल, वात घालून दिवे प्रज्वलित करावेत. काही ठिकाणी मातीचे दिवे करून देखील त्याची पूजा करतात. तर काही ठिकाणी कणकेचे उकडलेले दिवे बनवून देखील त्याचा नैवेद्य देखील दाखवतात. याच दिव्यांना हळद-कुंकू, फुले ,अक्षता वाहून पूजा केली जाते आणि आरती देखील केली जाते.
लहान मुलांना का ओवाळलं जात ?
या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं. ते यासाठी की आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे.
आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. दिवे लावून आपण अंधार दूर करतो. ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभंकरोती ही प्रार्थना दिवे लावणीच्या वेळी लहान मुलांकडून बोलूनही घेतली जाते आणि म्हणूनच त्यादिवशी लहान मुलांना ओवाळला जातो. दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते.
गटारी अमावस्या का साजरी केली जाते?
याच दीप अमावस्येला किंवा आषाढी अमावस्येला, गटारी अमावस्या देखील म्हणतात, कारण जसे मी आधी म्हटले की हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो आणि म्हणूनच या आषाढी अमावास्येला, गटारी अमावस्येला, गटारी साजरी करण्याची पद्धत आहे.
म्हणजेच या दिवशी तिखटाचे जेवण म्हणजेच मांसाहार केला जातो. कारण श्रावण महिन्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. त्यात हा माशांचा प्रजनन काळ असतो. म्हणून या श्रावण महिन्यात कोणीही मांसाहार करत नाही आणि त्यामुळे गटारी अमावस्येच्या दिवशी मांसाहार करण्याची पद्धत आहे.
यानंतर पूर्ण श्रावण महिना जो की आपण पवित्र महिना म्हणून म्हणतो. या महिन्यात अनेक सण देखील असतात आणि त्याच पार्श्वभूमी वरती आपण पूर्ण श्रावण महिना पाळतो. मांसाहार करत नाही आणि म्हणूनच गटारी अमावस्या साजरी केली जाते. याच दिवशी फक्त मांसाहार केला जातो.
तर अशीही दीप अमावस्या,आषाढ अमावस्या किंवा गटारी अमावस्या ज्यामध्ये दिव्यांना अधिक महत्त्व आहे. हे दिवे जे की आपण पवित्र श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला वापरणार. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन कृतघ्न होऊन त्यांची पूजा करणे, पूजन करणे हे या अमावास्येचे किंवा या दिवसाचे एक उद्दिष्ट आहे.